Source: Sakal Kolhapur
00519, 00520कोल्हापूर ः छत्रपती ताराराणी पुतळा परिसराला आलेली अवकळा.
छत्रपती ताराराणींच्यापुतळा परिसराला अवकळासमोर कार्यालय तरीही महापालिकेचे दुर्लक्षकोल्हापूर, ता. ४ ः शहराची ओळख सांगणारा, प्रवेशद्वार असलेला छत्रपती ताराराणी चौक सध्या महापालिकेची अनास्थी अनुभवतो आहे. महापालिकेचे विभागीय कार्यालय समोरच असूनही छत्रपती ताराराणींच्या पुतळा परिसराला अवकळा आली आहे. शोभेची झाडे पाण्याअभावी वाळून गेली आहेत. जी तग धरून आहेत, ती एखाद्या जंगली झुडुपाप्रमाणे वाढत आहेत. त्यांना ना आकार, ना रूप आहे, असे विदारक चित्र येथे आहे.अनेक शहरे आपापली वैशिष्ट्ये आणखी उजळवण्याच्या प्रयत्नात असतात. ऐतिहासिक पार्श्वभूमीची शहरे तर पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी विविध ठिकाणांची निगराणी, त्यांची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करतात. ज्या करवीर संस्थापिकेमुळे शहराची ओळख निर्माण झाली, त्या छत्रपती ताराराणींचा अश्वारूढ पुतळा गेल्या अनेक वर्षापासून शहराची ओळख बनला आहे. छत्रपती ताराराणी चौक, कावळा नाका याने ओळख असलेल्या चौकातील देखण्या पुतळ्याचा परिसरही तितकाच देखणा बनवला जाईल अशी महापालिकेकडून अपेक्षा होती. ज्यांचे छायाचित्र महापालिकेच्या लोगोत छापले जाते, त्या छत्रपतींच्या पुतळ्याची म्हणजेच शहराचे नाक असलेल्या परिसराची कुणाकडून तरी निगराणी करून घेण्याची अपेक्षाच नाही. स्वतः महापालिकेनेच त्यासाठी दररोज यंत्रणा लावायला हवी होती. पण जवळपास पाच वर्षापूर्वी एका स्वयंसेवी संस्थेकडून परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. त्यानंतर आजतागायत त्यात काही नवीन झालेले नाही. नवीन सोडा, आहे ते टिकवण्याचे कष्टदेखील घेतले गेलेले नाहीत असे दिसते.संस्थापिक छत्रपती ताराराणी असा जिथे फलक लावला आहे, तेथील शोभेची फुलझाडे करपून गेली आहेत. पुतळ्याजवळ फोटो घेण्याची कुणाची इच्छा झाली तर झाडांची अवस्था पाहून फोटो काढणार नाही. गोलाकार लावलेल्या रोपांची दुरवस्था झाली आहे. तीन टप्प्यात वेगवेगळी फुलझाडे असली तरी त्यांना व्यवस्थित आकार दिलेला नाही. त्यांची वाढ कशीही झाली असून केवळ काही हिरवापणा दाखवणे इतकेच त्याचे काम झाले आहे. तिथे असलेल्या तोफा त्या झाडांमध्ये लोपल्या गेल्या आहेत. या परिसरात वाहनांची प्रचंड वर्दळ आहे, त्यांच्याकडून होत असलेल्या प्रदूषणापासून वाचवण्यासाठी येथील फुलझाडांना दररोज पाणी देण्याबरोबरच त्यांची देखभाल करणे गरजेचे आहे. तेच काम महापालिकेकडून झालेले नाही. इतर ठिकाणी विविध संस्थांकडून दुभाजकांची व त्यावरील झाडांची देखभाल केली जाते. पण या महत्वाच्या चौकाची देखभाल व्हावी, असे वाटलेले नाही, याचेच दुर्देव आहे.——————कोटशहराचा प्रमुख चौक असलेल्या छत्रपती ताराराणी चौकातील देखभालीची गरज आहे. महापालिकेचे कार्यालय तिथेच असूनही तेथील यंत्रणेचे लक्ष नाही, याहून आणखी मोठे दुर्लक्ष काय असू शकते.- राजसिंह शेळके, माजी नगरसेवक